मंत्रिपदासाठी आतूर “भगवे” आमदारांना धक्का
मुंबई (प्रतिनिधी) : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार म्हणून दोन्ही पक्षाचे आमदार हे मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते. मात्र, शिंदे गटासह दोन्ही पक्षाच्या मंत्रिपदासाठी आतुर आमदारांना भाजपाने अजितदादांना खो दिला असे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी आतुर भावी मंत्र्यांचे चेहरे उतरले आहे.
राजभवनात रविवारी २ जुलै रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा पवार यांनी सातव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर जिल्ह्यातिल अमळनेर मतदारसंघाचे आ. अनिल भाईदास पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे गट, भाजपा, अजित पवार गट असे तिघांचेही आता प्रत्येकी ९ मंत्र्यांनी शपथ घेतली असून फडणवीस यांनी मोठी खेळी खेळली आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार म्हणून उपमुख्यमंत्री यांनीही होकार दिला होता. त्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडील अनेक जण मंत्रिपदासाठी उत्सुक होते. मात्र आता त्यांचा भ्रमनिरास झाला असून त्यांच्यासाठी वर्षभरानंतरदेखील “वेट अँड वॉच” हि वेळ आली आहे. तर जळगाव जिल्ह्याला तिसरे मंत्रिपद मिळाले असून, मंत्रिपदासाठी शर्यतीत असलेल्या चिमणराव पाटील, किशोर पाटील यांना मात्र पुन्हा एकदा ठेंगा मिळाला आहे.