पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यातील बांबरूड महादेव गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटून वाहन झाडावर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला असून चालकासह अन्य जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.१० वाजेच्या सुमारास भडगाव ते पाचोरा मार्गावर बांबरूड महादेव गावाच्या फाट्याजवळ हा अपघात घडला. एमएच १४ जीएन ८२९९ क्रमांकाची मारुती स्विफ्ट डिझायर कार भरधाव वेगात जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कारचा मागील डाव्या बाजूचा टायर फुटल्याने कार थेट रस्त्यालगतच्या झाडावर जोरात आदळली.
या अपघातात मिनाताई सुनील मानकर (वय ४४, रा. ह.मु पो. स्टे. सरमसपुरा, ता. अचलपूर, जि. अमरावती) तसेच कु. शिखा विनायकराव बेलसरे (वय २७, रा. काशीकर कॉलनी, नारायणपूर रोड, देवमाळी, परतवाडा रोड, ता. अचलपूर, जि. अमरावती) यांचा मृत्यू झाला.
तर फिर्यादी सुनील वामनराव मानकर यांना दुखापत झाली असून चालक शुभम विनायकराव बेलसरे याच्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातात कारचेही मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाचोरा पोलिस करीत आहेत.








