जळगाव (प्रतिनिधी) ;- कोरोनो विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक विषयक मार्गदर्शन व शंकांचे निरसन करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या विद्यार्थी शंका निरसन कक्षात गेल्या बारा दिवसात ६९२ विद्यार्थ्यांच्या शंकाचे समाधान करण्यात आले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी गठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीच्या अहवालातील शिफारशी नुसार कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा व शैक्षणिक हितासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी विद्यापीठांमध्ये विद्यार्थी तक्रार निवारण कक्ष व हेल्पलाईन सुरू करावी असे नमूद करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कुलगुरू प्रा पी.पी.पाटील यांच्या आदेशानुसार ११ मे पासून हा कक्ष स्थापन केला. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी हे कक्षाचे समन्वयक म्हणून काम पहात आहेत.
गेल्या बारा दिवसांत दुरध्वनी द्वारे ४९८ व मेलद्वारे १९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या अनुषंगाने प्रश्न विचारले.या सर्व प्रश्नाचे समिती सदस्यांनी निरसन केले.
या कक्षाचे कामकाज सुटीचे दिवस वगळून रोज सकाळी ११ ते ५ या वेळेत सुरू राहणार आहे. कक्षाचा हेल्पलाईन नं ०२५७-२२५८४११ असा असून ईमेल आय डी covid19helpdesk@nmu.ac.in असा आहे.यावर विद्यार्थ्यांना आपल्या शंका विचारता येतील. शंका विचारताना विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम व सेमिस्टरचा उल्लेख केल्यास योग्य निरसन करता येईल. या कक्षात सदस्य म्हणून प्रा.समीर नारखेडे,प्रा.किशोर पवार, प्रा.अजय पाटील, प्रा.नवीन दंदी प्रा.उज्वल पाटील हे काम पहात आहेत.