नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात विमान बंदीचा आदेश लागू होण्यापूर्वी विदेशातून भारतात आलेल्या नागरिकांच्या तपासणीच्या आकड्यांबाबत मोठी तफावत आहे. ज्यांची तपासणी झाली आहे किंवा ज्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे अशांची संख्या आणि प्रत्यक्षात विदेशातून भारतात आलेल्यांची संख्या या आकड्यांमध्ये मोठी तफावत आहे. अजूनही विदेशातून भारतात आलेले अनेक प्रवासी तपासणीविनाच सर्वत्र हिंडत असून त्यांच्यामुळे करोना प्रसाराचा मोठा धोका आहे त्यामुळे सर्वच राज्य सरकारांनी याबाबत उपाययोजना करावी, अशी सूचना कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी केली आहे. या दुर्लक्षित प्रवाशांमुळे करोना रोखण्याच्या आपल्या उपाययोजना तोकड्या पडू शकतात, त्यावर मोठा विपरीत परिणाम होऊ शकतो असे त्यांनी आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे. तसे पत्र त्यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवले आहे. गृहमंत्रालयाच्या इमिग्रेशन विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय विमान प्रवास बंदीचा निर्णय लागू होण्यापूर्वी किमान पंधरा लाख भारतीय नागरिक विदेशातून भारतात आले आहेत. त्या सर्वांच्या निरीक्षणाची गरज आहे. यापूर्वीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही राज्य सरकारांना या विषयीचे इशारे दिले होते पण त्याकडे राज्य सरकारांकडून दुर्लक्ष झाले आहे, असाही दावा केला जात आहे.राज्य सरकारच्या प्रतिनिधींचे म्हणणे असे आहे की, बऱ्याचवेळेला इमिग्रेशन विभागाकडून प्रवाशांची जी यादी किंवा माहिती राज्यांना दिली जाते ती अपुरी आणि तोकडी असते. काही वेळा हे प्रवासी आपला आंतरराष्ट्रीय फोन नंबर देतात त्यामुळे त्यांचा शोध घेणे अवघड बनते. बिहारमधील सरण जिल्ह्यात असे प्रवासी शोधण्यासाठी अंगणवाडीसेविका आणि शिक्षकांची मदत घेण्यात आली. त्यांनी अडीचशे ते तीनशे व्यक्तींना शोधून काढले आहे. तथापि, तेथील अजून तीस अशा व्यक्तींचा शोध लागलेला नाही.