कोल्हापूर (वृत्तसंस्था) – फडणवीस सरकारच्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना लाभ झाला नाही. मात्र, महाविकास आघाडीच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा दोन महिन्यांतच शेतकऱ्यांना लाभ होऊ लागला आहे. मी पालकमंत्री असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात २ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ टक्के शेतकरी नियमित कर्जफेड करणारे आहे. त्यांना अनुदान मिळावे ही अपेक्षा आहे. मात्र, हा शेतकरी स्वाभिमानी आहे. तो शासनाला कर्जमाफीबाबत रक्ताने पत्र लिहिणार नाही. त्यामुळे याबाबत कोणी राजकीय स्टंट करून शेतकऱ्यांचा अपमान करू नये, असा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपाला लगावला. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचाही सहभाग आहे. अस सांगत मुश्रीफ म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाणार असल्याचे अगोदरच घोषित केले होते. महाविकास आघाडीच्या सरकारचे शंभर दिवस निर्विघ्नपणे पार पडले आहेत. शिवसेनेच्या अजेंड्यावर असलेल्या दोन-तीन योजना मार्गी लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ते अयोध्येला जात आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राम मंदिराचा प्रश्न मिटला आहे. शिवाय ठाकरे यांच्या अयोध्या भेटीच्या दौर्यात महाविकास आघाडीचे दोन-तीन मंत्रीही सहभागी होत आहेत.