मुंबई (वृत्तसंस्था) – ‘ मुंबईत कोरोनाचा एकही रुग्ण नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन नागरिकांनी घाबरून जाऊ नये ‘, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सर्व जिल्ह्यांतील यंत्रणांना सतर्क करण्यात आलं आहे. जनजागृतीही व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे , असेही टोपे यांनी सांगितले.
दरम्यान महाराष्टातही कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चिंतेचे वातावरण आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे पाच रुग्ण आढळले आहेत. तसेच पुण्यात आढळलेल्या २ कोरोना रुग्णांसोबत यवतमाळ जिल्ह्यातील ११ जणांनी प्रवास केल्याचे उघडकीस आल्याने प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या सर्व ११ जणांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आज दुपारी त्यांची आरोग्य तपासणी होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाबाबत आढावा घेण्यासाठी आज तातडीची बैठक बोलावली आहे. त्याआधी मंत्रिमंडळ बैठकही होणार आहे. तिथे कोरोनावर सखोल चर्चा होईल. आयपीएल तसेच अन्य क्रीडा स्पर्धांबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात येईल , असेही टोपे यांनी स्पष्ट केले.सर्व जिल्ह्यांतील यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून जनजागृतीही व्यापक प्रमाणात सुरू करण्यात आली आहे , असे टोपे यांनी सांगितले.