तापी-पूर्णा काठचे अभ्यासू लोकनेतृत्व
जळगाव (प्रतिनिधी) : आजच्या बदलत्या राजकीय पटलावर सत्तेसाठी वारंवार भूमिका आणि पक्ष बदलणारे नेते जळगाव जिल्ह्याने पाहिले आहेत. अशा राजकीय वातावरणात सामान्य माणसाचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होत असताना, आपल्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासून एकच पक्ष आणि एकच झेंडा सोबत ठेवणारे प्रामाणिक नेतृत्व म्हणून नंदूभाऊ महाजन यांच्याकडे पाहिले जाते. विधानपरिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना उमेदवारी बहाल केल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून, यंदाची लढाई महायुतीच्या भक्कम साथीने सोपी झाली असल्याचे चित्र आहे. तांदलवाडी गावाला दुसऱ्यांदा ‘आमदार’ पदाचा बहुमान नंदूभाऊ महाजन यांच्या रूपाने मिळणार असल्याच्या चर्चेवर आता जळगाव जिल्ह्यात शिक्कामोर्तब होत आहे.


स्पष्टवक्तेपणा : राजकारणातील दुर्मिळ गुण
आजच्या राजकारणात शब्द आणि कृती यात मोठी दरी पाहायला मिळते. मात्र, नंदूभाऊ महाजन याला अपवाद आहेत. त्यांचा स्वभाव स्पष्ट, प्रामाणिक आणि रोखठोक आहे. जे मनात तेच ओठावर, हा त्यांचा स्वभाव असून जनतेच्या प्रश्नांवर किंवा कार्यकर्त्यांच्या हक्कांसाठी बोलताना ते कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत. हाच स्पष्टवक्तेपणा ही त्यांची खरी ओळख बनली आहे.
निवडणुकीच्या काळात अनेकदा समाजात जातीपातीचे राजकारण केले जाते. परंतु, नंदूभाऊ महाजन यांनी आपल्या सार्वजनिक जीवनात कधीही जाती-पातीच्या चौकटी स्वीकारल्या नाहीत. त्यांच्या मते, ‘माणुसकी’ हाच एकमेव धर्म आणि ‘माणूस’ हीच एकमेव जात आहे. समाजात सर्व घटकांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली प्रतिमा निर्माण केली आहे.
शेतकरी समाजासाठी आशेचा नवा किरण
नंदूभाऊ महाजन हे समाजातील प्रत्येक घटकाशी सहजतेने जोडले जातात. त्यामुळे विविध स्तरांतील लोक त्यांना आपला माणूस मानतात. जातीय राजकारणाच्या गर्दीत माणुसकीने स्नेह जपणारे हे नेतृत्व तापी, पूर्णा आणि गिरणाकाठच्या शेतकरी समाजासाठी आता नवा आशेचा किरण ठरणार आहे. नंदकिशोर महाजन यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष म्हणून काम करताना संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामीण विकासाची कास धरली. त्यांच्या जिल्हा परिषद व जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या कार्यकाळात सर्व सहकारी सदस्यांचे मोठे पाठबळ त्यांच्या पाठीशी राहिले.
आमदारकीसाठी कोणी नेता नव्हे, तर एक कुटुंबप्रमुखच निवडणूक लढवत असल्याची भावना त्यांच्या प्रत्येक ठिकाणच्या भेटींमध्ये व लोकांच्या बोलण्यातून दिसून येत आहे.
महायुतीची भक्कम साथ; विक्रमी विजयाचा विश्वास
विधानपरिषदेची ही निवडणूक पक्षीय समीकरणांवर अवलंबून आहे. जळगाव जिल्ह्यात महायुतीच्या नगरसेवक व नगराध्यक्षांना जनतेचा प्रचंड कौल मिळाला असल्याने भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या सर्वांची गोळाबेरीज महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या पाठीशी भक्कम मतदार संख्या उभी करते. गेल्या वीस-पंचवीस वर्षांच्या राजकीय कार्यकाळात त्यांची स्वतःची निर्माण झालेली सर्वसमावेशक छबी आणि महायुतीच्या सर्वपक्षीय नेते व पदाधिकाऱ्यांचा त्यांच्यावर असलेला विश्वास ही नंदकिशोर महाजन यांची अत्यंत जमेची बाजू आहे.
“पक्ष दोन नव्हे चार डोळ्यांनी पाहत असतो. हे नंदकिशोर महाजन यांनी उमेदवारी जाहीर झाल्यावर मांडलेले निरीक्षण महायुतीतील सर्व मतदार नगरसेवकांना सुद्धा तंतोतंत लागू पडणार असल्याने या निवडणुकीत कोणतेही प्रकारे धोका न होता प्रत्येक जण आपली पक्षनिष्ठा व महायुतीचा धर्म नक्की निभावणार असल्याचे आश्वासक चित्र दिवसास दिवस गडद होत आहे.”
— चंद्रकांत बाविस्कर, जिल्हाध्यक्ष, भाजपा
पहिल्यांदाच खरा शेतकरी विधानपरिषदेची पायरी चढणार
जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आतापर्यंत व्यापाऱ्यांच्या आणि सत्तेतील मोठ्या नेत्यांच्या विश्वासातील माणसाला आमदारकीची बक्षीसी म्हणून देण्याची निवडणूक म्हणून पाहिली जाते. राज्याची विधानपरिषद हे लोकशाहीचे कायदे करणारे वरिष्ठ सभागृह असल्याने येथे अभ्यासू, संवेदनशील आणि समाजाची नाळ जोडलेले नेतृत्व निवडून गेले पाहिजे. यंदा नंदूभाऊंसारखा खऱ्या अर्थाने शेतकरी असणारा आणि ग्रामीण तसेच नागरी प्रश्नांची उत्तम जाण असणारा पहिला आमदार सभागृहात पोहोचणार असल्याने जनतेच्या प्रश्नांना अधिक प्रभावी आवाज मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.









