मुक्ताईनगर : तालुक्यातील बेलसवाडी येथे जुन्या वादातून १९ वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून त्याचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, प्रकरणातील संशयित १७ वर्षीय अल्पवयीन मुलगा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


जुन्या वादातून चाकूने हल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबुजर रफीक शेख (वय १९, रा. बेलसवाडी, ता. मुक्ताईनगर) हा शुक्रवारी रात्री सुमारे ८.४५ वाजता गावातील साबीर खान मेंबर यांच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या प्लॉटवर होता. यावेळी मागील भांडणाच्या कारणावरून त्याचा एका अल्पवयीन मुलासोबत वाद झाला.वाद विकोपाला गेल्यानंतर संशयिताने अबुजर याच्या छातीत चाकूने वार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर दुखापत झाल्याने अबुजर याचा मृत्यू झाला.
मस्करीवरून वाद पेटल्याची माहिती
प्राथमिक माहितीनुसार, मयत तरुण आणि संशयित यांच्यात यापूर्वी मस्करी करण्याच्या कारणावरून वाद झाला होता. याच जुन्या वादातून शुक्रवारी रात्री पुन्हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या घटनेमागील नेमके कारण आणि घटनाक्रमाचा तपास पोलीस करीत आहेत.
मुक्ताईनगर पोलिसांत खुनाचा गुन्हा
या घटनेप्रकरणी रफीक शेख नुरा (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात CCTNS क्रमांक ३१९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०३(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनेत वापरण्यात आलेले चाकू हे हत्यार पोलिस तपासाचा महत्त्वाचा भाग असून, घटनास्थळाचा पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.प्रकरणातील संशयित हा १७ वर्षांचा अल्पवयीन असल्याने त्याच्याबाबतची पुढील कायदेशीर प्रक्रिया बाल न्याय व्यवस्थेतील लागू तरतुदींनुसार केली जाणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश गोसावी करीत आहेत.








