कोल्हापूर (वृत्तसंस्था ) – तालुक्यातील कागलमध्ये एकाने आपल्या पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या करून स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची कबुली दिल्याची धक्कादायक घटना समोर आली असून यामुळे जिल्हा हादरला आहे.
प्रकाश बाळासाहेब माळी (वय ४२) असे या आरोपीचे नाव आहे. काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलामध्ये मंगळवारी दुपारी दोनपासून रात्री आठपर्यंत हा थरारक हत्याकांड सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
त्यानंतर प्रकाश रात्री नऊच्या दरम्यान स्वतःहून कागल पोलीस ठाण्यात हजर झाला आणि याबाबत माहिती दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं, की प्रकाश शहरातील काळम्मावाडी वसाहतीजवळील घरकुलामध्ये पत्नी, मुलगा आणि मुलीसह राहायचा. मंगळवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास मुले शाळेला गेल्याचे पाहून प्रकाशने पत्नीचा गळा आवळून खून केला.सायंकाळी साडेपाचला मुलगा कृष्णात शाळेतून घरी आला.
कृष्णात दिव्यांग होता. प्रकाशने मुलाचाही दोरीने गळा आवळला आणि खून केला. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास बाहेर गेलेली मुलगी आदिती घरी परत आली. यावेळी आरोपीने तिचाही गळा आवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. यामुळे प्रकाशने तिच्या डोक्यात वरवंटा मारला आणि तिचीही हत्या केली. यानंतर तो स्वतः पोलिसांत हजर झाला.