जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरामध्ये सोमवारी दि. ३ जून रोजी धक्कादायक घटना उघड झाली आहे. जिल्ह्यात खुनाची मालिका सुरूच असून शहरात सोमवार दि. ३ जून रोजी सकाळी एका कामगाराचा मानेवर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमागील कारण समोर येत आहे. ही हत्या किरकोळ कारणावरून शाब्दिक वादातून झाली असल्याचे दिसून आले आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी ३ संशयित आरोपींना अटक केली आहे.
ललित प्रल्हाद वाणी (वय ४५, रा. नाथ वाडा, जळगाव) या कामगाराचा मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास खुन झाल्याचे उघड झाले आहे. हा कामगार सुप्रीम कंपनीतून दुसरी शिफ्ट ३ ते ११ आटोपून घरी परतत होता. इच्छादेवी चौकात रात्री ११:४० वाजता उतरल्यानंतर तो ५ ते १० मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या नाथवाडा परिसरातील घराकडे पाई निघाला होता. नाथवाडा परिसरात आल्यावर एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून तो जात असताना त्याला संशयित आरोपी कमल कीरण बागडे (वय २०, रा. कंजरवाडा, जळगाव) हेमंत उर्फ हुल्या सपकाळे (वय २०, तुकाराम गाडी, जळगाव) व युवराज कैलास पाटील (वय १८, जानकी नगर जळगाव) हे दिसले.
मयत ललित वाणी आणि तिघा संशयित आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून शाब्दिक वादावादी झाली. या वादावादीत तिघांनी त्याला मारहाण केली तर एकाने मानेवर थेट चाकूने वार केला. एका वारमध्येच ललित वाणी हा खाली कोसळला. त्यावेळेला दोघे संशयित आरोपी हे पळून गेले. सकाळी पाच नंतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ललित वाणीचा मृतदेह दिसला. त्यानंतर घटना उघड झाली.
दरम्यान संशयित आरोपी कमल बागडे, हेमंत सपकाळे, युवराज पाटील यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ललित वाणी यांच्या पत्नी मेघा ललित वाणी (वय ३८) यांच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एपीआय आसाराम मनोरे, पीएसआय रविंद्र चौधरी, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, सचिन पाटील, छगन तायडे, विनोद ऑस्कर, सचिन मुंडे, राजेंद्र कांडेकर, रतीलाल पवार, सिध्देश्वर डापकर यांनी संशयित आरोपींना अटक केली.