कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अंगणवाडी कर्मचारी काम करत होत्या. याची दखल घेत शासनाने या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांना पन्नास लाख रुपयांचे विमा कवच लागू केले होते. कोरोनाचे काम करत असताना पाचोरा प्रकल्पातील वरखेडी येथे मदतनीस म्हणून कार्यरत असलेल्या मंगला गणपत पाटील यांचा कोरोना संसर्ग होवून मृत्यू झाला. त्यांचा विमा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला असता त्यात काही त्रुटी निघाल्या.
सदर त्रुटींची पूर्तता करण्यासाठी जि.प.च्या महिला बालविकास विभागाने दि.१६ जून २०२३ रोजी प्रकल्प कार्यालयाला पत्र दिले आहे. परंतु प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी दिनेश पाटील आणि प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी जिजा राठोड यांच्या कामचुकार व हलगर्जीपणामुळे सदरच्या त्रुटींची वर्षभरात ही पूर्तता झालेली नाही. परिणामी मयत मंगल पाटील यांच्या वारसांना आजपर्यंत विमा रक्कम मिळाली नाही.
भुसावळ आणि पाचोरा प्रकल्पात नव्याने कामावर रुजू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती आज पर्यंत अद्ययावत न केल्यामुळे सदर मदतनीस सुमारे वर्षभर मानधनापासून वंचित असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच दोन्ही प्रकल्पातील बहुसंख्य अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना सन २०२३-२०२४ ची गणवेश रक्कम, भाऊबीज भेट रक्कम आणि प्रवास भत्ते बिल अदा झालेले नाही.
वरील बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषद समोर संघटनेचे कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली मयत मंगलाबाई गणपत पाटील (वरखेडी ता.पाचोरा) यांच्या आई शोभाबाई पाटील यांच्यासह कुटुंबिय आणि अंगणवाडी कर्मचारी उपोषणास बसले होते. सामान्य प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे यांनी शिष्टमंडळाशी चर्चा केली. सदर चर्चेत भुसावळ प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचारी यांचे प्रलंबित देयके त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याचे सांगितले.
तसेच पाचोरा तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी यांची देयके येत्या आठ दिवसांत बँक खात्यात जमा केली जातील असेही कुडचे यांनी सांगितले. कार्यालयीन कामात हलगर्जीपणा व दिरंगाई करणाऱ्या दिनेश पाटील आणि जिजा राठोड यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली असल्याचेही कुडचे म्हणाल्या. स्नेहा कुडचे यांच्यासह जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत, कक्ष अधिकारी अजय पाटील, कार्याध्यक्ष रामकृष्ण बी.पाटील, मनिषा कोठावदे, पुष्पा परदेशी, निता सुरवाडे, उषा लोधी, वैशाली तायडे, शोभाबाई पाटील उपस्थित होते. जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांनी संघटनेला लेखी पत्र दिल्याने सदरचे उपोषण तूर्त स्थगित केले असल्याचे रामकृष्ण बी.पाटील यांनी कळविले आहे.