मुंबई ;- राज्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध घालायला सुरुवात केली आहे. अशातच कोरोना रुग्ण आढळल्यास कोरोना रुग्णामागे 20 ते 30 जणांची तपासणी करा, असे आदेश राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत.

सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचं प्रमाण वाढवा. चाचण्यांचे प्रमाण वाढवून पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यापेक्षा खाली आणावा, असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तीन ते चार महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येने 5 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. नागरिकांनी ही बाब गांभिर्याने घेऊन ‘एसएमएस’चा म्हणजेच सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनिटायजरचा वापर करावा, असं आवानही राजेश टोपे यांनी केलं आहे.
दरम्यान, राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटरवरुन दिली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणे दिल्यास तात्काळ आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, असं ते म्हणाले आहेत.







