डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या अन्नपुर्णालयमचा गोबरगॅस प्रकल्प चर्चेत
जळगाव(प्रतिनिधी) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाच्या अन्नपुर्णालयम पुढाकार घेत कृषि तज्ञांच्या मदतीने गोबर गॅस प्रकल्प यशस्वीपणे कार्यान्वित केला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज तब्बल १० ते १२ गॅस सिलेंडरची बचत होत असून पर्यावरण संरक्षणासोबतच इंधन बचतीलाही मोठा हातभार लागत आहे.


हा प्रकल्प आज ऊर्जा निर्मिती, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन, इंधन बचत आणि पर्यावरण संरक्षण यांचा उत्कृष्ट समन्वय साधणारा आदर्श मॉडेल बनला आहे.महाविद्यालय परिसरातील पशुधनातून मिळणारे शेण, अन्नपूर्णा भोजनालयातील उरलेला अन्नकचरा तसेच इतर सेंद्रिय पदार्थांचा वापर करून या प्रकल्पात दररोज सुमारे ४ ते ६ टन बायो-वेस्ट प्रक्रियेत वापरला जातो. या प्रक्रियेतून दररोज अंदाजे १६० ते २०० किलो बायोगॅसची निर्मिती केली जाते. काही वेळा सरासरी १६० ते २०० किलोपर्यंत गॅस उत्पादन होत आहे. भविष्यातील ऊर्जा संकट आणि पर्यावरणाची गरज ओळखून महाविद्यालय प्रशासनाने त्यावेळीच ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली होती. आज हा प्रकल्प संस्थेसाठी आदर्श ठरत आहे.महाविद्यालयाच्या अन्नपूर्णालयामध्ये दररोज सुमारे २ ते अडीच हजार लोकांचा स्वयंपाक केला जातो. या स्वयंपाकासाठी लागणार्या इंधनाचा मोठा भाग गोबर गॅस प्रकल्पातूनच उपलब्ध होतो. चहा, नाश्ता तसेच गरम पाणी तयार करण्यासाठीदेखील याच गॅसचा वापर केला जातो. त्यामुळे एलपीजीवरील खर्चात मोठी बचत होत आहे. वेस्ट टू एनर्जी ही संकल्पना प्रत्यक्षात राबविण्यात हा प्रकल्प यशस्वी ठरत आहे.अन्नपूर्णालयाचे प्रमुख डी. टी. राव तसेच डॉ.उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. पी. आर. सपकाळे यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारण्यात आला. त्यांच्या पुढाकारामुळे आज हा प्रकल्प ऊर्जा बचत, पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता अभियानासाठी प्रेरणादायी ठरत आहे.महाविद्यालय प्रशासनाच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यात अशा पर्यावरणपूरक प्रकल्पांची गरज अधिक वाढणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.









