नांद्रा बु. येथील ग्रामस्थ आक्रमक ; जिल्हाधिकार्यांना निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नांद्रा बु. येथील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत गिरणा नदी पात्रातून वाळूचा उपसा करण्याला विरोध केला आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनाने याबाबत ठोस निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा वाढत असल्याने बहुतांश तालुक्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. अशातच गिरणा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा होत असल्याने गिरणेवर अवलंबून असलेल्या गावांची पाणीपातळी खोलवर गेल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. नांद्रा बु. येथील वाळू ठेका हा डेपो पध्दतीने व्ही.के. एंटरप्रायझेस यांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडून अधिकचा वाळू उपसा होत असल्याने या परिसरातील ग्रामस्थांनी प्रशासनाला यासंदर्भात जाब विचारला आहे.
वाळू ठेक्याचा लिलाव करण्यापूर्वी प्रशासनाकडून ग्रामपंचायतींचा ठराव मागविला जातो. ठरावात परवानगी असेल तरच त्याठिकाणच्या ठेक्याचा लिलाव होतो. जळगाव तालुक्यातील नांद्रा बु. या गावाने वाळू ठेक्यासाठी कधीही अनूकुल ठराव दिला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वारेमाप वाळू उपशामुळे गावातील विहीरींची पाणीपातळी खोल जात असल्यानेच आम्ही वाळू उपशाला विरोध दर्शविला असल्याचे सांगण्यात आले.
नांद्रा बु. येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावाला लागून गिरणा नदी आहे. परंतु या वर्षी पाऊस खुप कमी प्रमाणात पडला असल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. नदी पात्रातील वाळूचा उपसा केल्यास पाण्याची पातळी अजून कमी होईल. परिणामी शेतातील पिकांना आणि गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल. तसेच वाळू वाहतुक करतांना गावाचे रस्ते खराब होतात. याचा त्रास शेतक-यांनाही होतो. म्हणुन या अडचणींचा विचार करता नांद्रा बु. येथे वाळू लिलाव करण्यास संपुर्ण गावाचा विरोध असून लिलाव करण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे. निवेदन घेऊन ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. त्यांना गाऱ्हाणे सांगितले.
यावेळी सरपंच कैलास पाटील, उपसरपंच एकनाथ सोनवणे, सदस्य सुनील सोनवणे, सुधाकर सोनवणे, शिरीष भोई, निलेश वाघ, सुदर्शन पाटील, सुधाकर भोई, हरिष भोई, भरत वाघ, देविदास सपकाळे, गुरूदास चौधरी, महेश भोई, मंदार वाघ, निरंजन भोई, जयेश भोई, वसंत सपकाळे, विनय सोनवणे, दिनेश सोनवणे, आशिष सोनवणे, दत्तु वाघ, दिलीप आगीवाल आदी उपस्थित होते.