घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाल्याचे सांगितल्याचा राग; जळगावात प्रौढाच्या डोक्यात दगड घातला


जळगाव शहरातील खडके चाळीतील प्रकार; एकाच कुटुंबातील चौघांवर गुन्हा दाखल
जळगाव:
“तुमच्या घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाली आहे,” असे सांगण्यास गेलेल्या ४५ वर्षीय मजुराला एकाच कुटुंबातील चौघांनी मिळून मारहाण करत त्यांच्या डोक्यात दगड मारून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. जळगाव शहरातील शिवाजी नगरमधील खडके चाळीत शुक्रवारी सकाळी ५:३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, खडके चाळीत राहणारे नारायण भागवत कोळी (वय ४५) हे शुक्रवारी (७ ऑगस्ट) सकाळी ५:३० वाजता आपल्या घराबाहेर आले असता, त्यांच्या घरासमोर पाण्याची नळी निघालेली दिसली. शेजारी राहणाऱ्या पाटील कुटुंबाच्या घोड्याचा पाय लागल्यामुळे ही नळी निघाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे नारायण कोळी हे पाटील यांच्याकडे जाऊन “घोड्याचा पाय लागून पाण्याची नळी निघाली आहे,” एवढेच सांगत होते.
मात्र, या क्षुल्लक बोलण्याचा प्रचंड राग आल्याने संशयित युवराज पाटील व त्यांचा मुलगा अक्षय युवराज पाटील यांनी नारायण कोळी यांना जबरदस्तीने पकडून ठेवले. याच दरम्यान विशाल युवराज पाटील याने तेथे पडलेला दगड उचलून थेट नारायण कोळी यांच्या डोक्यात मारून त्यांना रक्तबंबाळ केले. तर संशयित नंदा युवराज पाटील हिने नारायण कोळी व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नारायण कोळी यांनी तातडीने जळगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी सकाळी १०:०४ वाजता संशयित विशाल पाटील, युवराज पाटील, अक्षय पाटील व नंदा पाटील या चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११८(१) (घातक शस्त्राने/वस्तूने दुखापत करणे), ३५२ (शिवीगाळ करणे) व ३(५) (सामूहिक इरादा) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार जितेंद्र तावडे करत आहेत.








