भुसावळ ( प्रतिनिधी ) – प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर चाकू व लोखंडी सळईने हल्ला करण्यात आल्याची घटना भुसावळ शहरातील चिराग हॉल परिसरात घडली. या प्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास चिराग हॉलजवळ ही घटना घडली. फिर्यादी आवेश शेख बिस्मिल्ला (वय २५, व्यवसाय ओला कॅब चालक, मूळ रा. भुसावळ, सध्या पनवेल मुंबई) यांनी आरोपींच्या बहिणीसोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी फकीरा तडवी, जाहिद तडवी, शाहिद तडवी, आवेश तडवी आणि फैजान तडवी (सर्व रा. आयान कॉलनी, भुसावळ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी “भुसावळमध्ये कसा आलास, तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत त्याला मारहाण सुरू केली. त्यानंतर काही आरोपींनी चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हाताने वार अडवल्याने त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली. तसेच छातीवरही जखम झाल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, फिर्यादीला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या मोठ्या भावालाही मारहाण करण्यात आली. आरोपींपैकी एकाने लोखंडी सळईने त्याच्या डोक्यावर वार केल्याने तो जखमी झाला.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बाजारपेठ पोलीस करीत आहेत.









