धरणगाव तालुक्यातील झुरखेडाजवळ घडली दुर्घटना
जळगाव (प्रतिनिधी) : रिक्षाने प्रवास करत असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी होवून ७० वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे घडली. पाळधी दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
भिवसन खंडू कोळी (वय ७० रा. पाळधी ता. धरणगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पाळधी येथे भिवसन कोळी हे पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मजूरीचे काम करून ते उदरनिर्वाह करतात. अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथे नातेवाईकांकडे लग्न असल्याने भिवसन कोळी हे शनिवारी दि. २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता रिक्षाने निघाले होते.
धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावाजवळून जात असतांना चालकाचा ताबा सुटल्याने रिक्षा पलटी झाली. यात भिवसन कोळी हे दबले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी वाहनाने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुगड यांनी तपासून मयत घोषीत केले.
यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व अपघाताची माहिती जाणून घेतली. याबाबत पाळधी दुरक्षेत्र येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.