महामार्गावरील पोद्दार शाळेजवळ पोलिसांच्या शोधकार्याला यश
जळगाव (प्रतिनिधी) : खंडेराव नगर परिसरामध्ये नाल्यात चेंडू घेण्यासाठी उतरलेला सहा वर्षीय बालक हा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी दि. ६ जुलै रोजी दुपारी घडली होती. दरम्यान, या मुलाचा मृतदेह तब्बल २० तासांनी राष्ट्रीय महामार्गावरील पोद्दार शाळेजवळील नाल्याजवळ अडकलेला आढळून आला आहे. प्रसंगी बालकाच्या कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला आहे.

जळगाव शहरामध्ये शनिवारी दुपारी १ ते ५ या वेळेमध्ये मुसळधार पाऊस पडला. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. खंडेराव नगर मध्ये असणारा मोठा नाला हा अनेक वर्षांपासून सुरक्षित नाही. या नाल्याजवळ काही मुले खेळत असताना त्यात सचिन राहुल पवार (वय ६, रा.हरी विठ्ठल नगर, जळगाव) हा चेंडू घेण्यासाठी गेला असता नाल्यात वाहून गेला होता.(केसीएन)यावेळी पोलिसांनी शोध मोहीम स्थानिक व मनपाच्या तरुणांच्या मदतीने सुरू केली होती. मात्र रात्री उशिरापर्यंत यश न मिळाल्याने शोध कार्य थांबवण्यात आले होते.
मात्र सकाळी ७ वाजेनंतर पुन्हा एकदा नाल्याच्या विविध भागांमध्ये खंडेराव नगर पासून थेट राष्ट्रीय महामार्गावरील गिरणा नदीकडे नाला संपतो तिथपर्यंत पुन्हा एकदा शोधकार्य सुरू करण्यात आले होते.(केसीएन)या कामात अग्निशमन दल, स्थानिक तरुण यांची मदत घेण्यात आली. अखेर रविवारी दि. ७ जुलै रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास तब्बल २० तासांनी सदरहू बालक सचिन पवार याचा मृतदेह पोहेकॉ जितेंद्र राजपूत, उमेश पवार यांच्या पथकाला आढळून आला आहे.
या मृतदेहाला पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकरणी रामानंदनगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम देखील सुरू आहे. दरम्यान या घटनेमुळे पवार कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला असून घटनेबद्दल जळगाव शहरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शोधकार्यासाठी रामानंदनगर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ जितेंद्र राजपूत, इम्रान मलिक, उमेश पवार, निलेश पाटील, नाईक विनोद सूर्यवंशी, रेवानंद साळुंखे, अजय सपकाळे, कमलाकर राजहंस, जुलालसिंग परदेशी यांच्यासह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे रवींद्र भोई, दीपक महाले, गोकुळ सुतार, जगदीश बैरागी, योगेश गालफाडे, सिताराम पवार, ज्ञानेश्वर भालेराव, दुर्गेश पवार, सुपडू माळी, भगवान माळी, महानगरपालिकेचे अधिकारी कांबळे आदींच्या पथकाने शोधकार्यात परिश्रम घेतले.