जळगाव (प्रतिनिधी) : – पर्यावरण समतोल राखणे आणि परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने ग्रामविकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे जळगाव येथील गायत्रीनगर ओपन स्पेस व निमजाय माता मंदिर परिसरात ६० वृक्षांचे यशस्वी रोपण करण्यात आले. या पर्यावरणपूरक मोहिमेत LNS हायस्कूलच्या १९८८ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती
या वृक्षारोपण मोहिमेला शहराचे आमदार सुरेश (राजूमामा) भोळे यांनी विशेष उपस्थिती लावली. आमदार भोळे आणि ग्रामविकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपणाचे आणि त्यांच्या जतनाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच, बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
गौरव पाटील यांच्या संकल्पनेतून उपक्रम
या संपूर्ण वृक्षारोपण मोहिमेची मूळ संकल्पना LNS हायस्कूल ८८ बॅचचे सदस्य व फोटोमॅक्स चे संचालक संजय पाटील यांचे सुपुत्र गौरव पाटील यांनी मांडली होती. त्यांच्या या संकल्पनेला बॅचच्या सर्व सदस्यांनी आणि ग्रामविकास संस्थेने तात्काळ पाठिंबा देत हा उपक्रम प्रत्यक्ष जमिनीत उतरवला. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळासह सावली देणाऱ्या विविध देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.
सामूहिक शपथ आणि माजी विद्यार्थ्यांचा सहभाग
वृक्षारोपणासोबतच गायत्रीनगर परिसरातील नागरिकांनी लावलेल्या झाडांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा सामूहिक संकल्प केला. या मोहिमेत LNS हायस्कूल ८८ बॅचचे राहुल कुलकर्णी, अमोघ जोशी, संजय पाटील, रवी गावंडे, आनंद तारे, प्रवीण वाणी, प्रभाकर जाधव या सदस्यांसह स्थानिक रहिवाशी भास्कर सोनार, राहुल पाटील, संजय वाल्हे, तुषार पाटील, धनराज पाटील, पंकज सोनवणे, सचिन वाघ, केतन निसाड, सूरज राठोड आदींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रमदान केले.
परिसरातील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारली आहे.









