जळगाव तालुक्यातील आसोदा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) ;– शेतमजूराने आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरूवारी ४ जून रोजी पहाटे ४ वाजता जळगाव तालुक्यातील आसोदा गावात समोर आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रमेश काशिनाथ पाटील वय ५८ रा. आसोदा ता. जि.जळगाव असे मयत शेतमजूराचे नाव आहे.
जळगाव तालुक्यातील आसोदा गावात रमेश पाटील हे शेतमजूर असून बकऱ्या चारून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना दुर्धर आजार होता. गुरूवारी ४ जुन रोजी रात्री १२.३० वाजता ते पत्नीला बाहेर जात असल्याचे सांगून दुचाकी घेवून निघाले. विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. दरम्यान घरी परतले नाही म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरूवात केली. पहाटे ४ वाजता विहिरीजवळील झाडाजवळ त्यांची दुचाकी आढळून आली. त्यामुळे ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून पाहिले असता रमेश पाटील यांचा मृतदेह पाण्यात तरंगतांना दिसून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.