जळगाव (प्रतिनिधी) : येथील शिव कॉलनी चौकात दारूच्या अड्ड्यावर किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून अक्षय चव्हाण या २३ वर्षीय तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तपास चक्रे फिरवून निलेश प्रवीण पवार रा. रिंग रोड यास शिरसोली येथून गजाआड केले आहे.
अक्षय अजय चव्हाण (वय २३, रा. पिंप्राळा, मढी चौक) या तरुणाचा रविवारी मोबाईलच्या कारणावरून वाद होऊन खून झाला होता. या प्रकरणात दोन जण जखमी झाले होते. पोलिसांनी तपासचक्र फिरवत यातील संशयित खुनी निलेश प्रवीण पवार रा.रिंग रोड यास शिरसोली येथे शिताफीने अटक केली.
हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राठोड व एस.बी.ढवळे यांना माहिती मिळाल्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रताप शिकारे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, फौजदार अतुल वंजारी ,जितेंद्र राठोड ,समाधान तहाकडे ,शुद्धोधन ढवळे, इमरान सय्यद, किशोर पाटील, राकेश बच्छाव ,मुदस्सर काझी, सुधीर साळवे व सचिन पाटील पथक नेमून त्यास जेरबंद केले. तो शिरसोली येथील जंगलात बऱ्याच अंतरावर लपून बसला होता. त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.