रावेर शहरात घटना
रावेर (प्रतिनिधी):- रावेर शहरात सुरू असलेल्या अमृत योजनेअंतर्गत साठवून ठेवलेल्या पीव्हीसी पाईपांना भीषण आग लागल्याची घटना सोमवारी २ मार्च दुपारी घडली. या आगीत मोठ्या प्रमाणावर पाईप जळून खाक झाले असून, प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

छोरिया मार्केटलगतच्या परिसरात अमृत योजनेसाठी लागणारे पीव्हीसी आणि लोखंडी पाईप उतरवून ठेवण्यात आले होते. सोमवारी दुपारी अचानक लागलेल्या या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच रावेर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तब्बल आठ फेऱ्या मारून पाण्याचा मारा केला. शर्थीच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश आले. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच माजी नगराध्यक्ष पद्माकर महाजन, भास्कर महाजन, नगरसेवक राजेश शिंदे, भूषण महाजन, दीपक महाजन आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. योजनेचे कंत्राटदार इंद्रा रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे ४० लाखांचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
अमृत योजनेची स्थिती
एकूण खर्च: सुमारे ४२ कोटी रुपये.
व्याप्ती: शहरातील ३२ कॉलनींमध्ये ७८ कि.मी. अंतराचे पाईपलाईन काम.
प्रगती: सुमारे ६०% काम पूर्ण, ३५ कि.मी.चे काम शिल्लक.
कंत्राटदार: ‘जयंती सुपर कन्स्ट्रक्शन’ (गुजरात).









