मुंबई (प्रतिनिधी) – राज्य शासनाच्या माध्यमातून एक मोठा कौतुकास्पद निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील ६\ते १८ वर्ष वयोगटातील मुलांना मोफत चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील मुलांच्या दृष्टीदोषाचे निदान करून त्यांना मोफत चष्मे देण्यासाठी शासनाकडून निधीची नुकतीच उपलब्धता करून देण्यात आली आहे.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून राज्य शासनाची नवीन योजना म्हणून हा निर्णय राबविला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. लहान मुलांमध्ये अलीकडील काही वर्षात विशेषता कोरोना काळापासून दृष्टीदोष पाहायला मिळत आहे. ६ ते १८ वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांना कोरोनामुळे मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने अभ्यास करण्याची सवय लागली. यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला. परिणामी त्यांच्या डोळ्याच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला. याच पार्श्वभूमीवर शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असून आता राज्यातील शासकीय व निमशासकीय ८१,५५६ शाळांमधील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी शास्त्रीय पद्धतीने केली जाणार आहे.
या तपासणीनंतर या शाळकरी विद्यार्थ्यांना आवश्यकतेनुसार मोफत चष्मे पुरविले जाणार आहेत. ही योजना राबविण्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षात ५ कोटी रूपये इतका निधीची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. मात्र सुधारित अंदाजानुसार दीड कोटी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमास उपलब्ध करून देण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी लागणारा निधी महाव्यवस्थापक हाफकिन महामंडळाकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.