जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) : भटक्या जाती विमुक्त जमातीच्या नागरिकांना सरकारी योजनेतून कर्ज मिळण्याकरिता लाच मागणाऱ्या वसंतराव नाईक महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ५ हजारांची लाच मागताना रंगेहाथ अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
तक्रारदाराला सरकारी योजनेअंतर्गत १ लाख रुपये कर्ज मिळणार होते. त्यापैकी ७५ हजार रुपये पहिला हफ्ता मिळाला होता. उर्वरित २५ हजाराचा दुसरा हफ्ता तक्रारदाराला मिळणार होता. मात्र हा हफ्ता पाहिजे असेल तर ५ हजार रुपये द्यावे लागतील असे जिल्हा व्यवस्थापक भीमराव लहू नाईक (वय ५५), कंत्राटी कर्मचारी आनंद नारायण कडेवाल (वय ३२) यांनी सांगितले होते. त्यानुसार तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली होती.
त्यानुसार मंगळवारी ५ सप्टेंबर रोजी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपयांची लाच घेताना अधिकारी भीमराव नाईक व आनंद कडेवाल यांना रंगेहाथ पकडले. त्यानुसार त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून त्या दोघांवर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाई करण्याकामी पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एएसआय दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, प्रदीप पोळ, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.