भडगाव तालुक्यातील नालबंदी परिसरातील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : भडगाव तालुक्यातील नालबंदी गावाजवळील पुलावर घडलेल्या अपघातात दोन शेतमजूर ठार झाल्याची घटना दि. २७ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली आहे. अपघातातील दोघांपैकी एकाचा जळगावात उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.
संतोष भिल (वय ३५) व गोकुळ रमेश सोनवणे (वय ३५, रा. सावदे ता. भडगाव) असे मयत दोघांचे नाव आहे. ते भडगाव तालुक्यातील दुसऱ्या गावात एका लग्नाच्या कार्यक्रमाला जात होते. नालबंदी गावाजवळील छोट्या पुलावर त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात घडला. दुचाकीवरील दोघेही पुलाचे कठडे तोडून खाली पडले. यात संतोष भिल या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर गोकुळ सोनवणे हा गंभीर जखमी झाला होता. त्याचेवर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान गोकुळ सोनवणे हा मंगळवारी दि. २८ मे रोजी सकाळी मयत झाला आहे.
संतोष भिल याचे पश्चात चार भाऊ, पत्नी, १ मुलगा, २ मुलगी असा परिवार आहे. गोकुळ सोनवणे यालाही पत्नी, १ मुलगा, २ मुली असा परिवार आहे. दोघेही शेतमजुरी करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. दोघं मित्रांच्या मृत्यूमुळे सावदे गावात शोककळा पसरली आहे. घटनेप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.