मुंबई : देशभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाकडून अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्याअंतर्गत रविवारी मध्यरात्रीपासून मुंबई लोकललाही ब्रेक लागणार आहे.
प्रशासनाने वारंवार सुचना करुनही रेल्वेमध्ये गर्दी करणाऱ्या नागरिकांच्या वाढत्या प्रमाणामुळे कोरोनाची लागण होण्याची वाढती शक्यता पाहता अखेर प्रशासनाला मुंबई लोकल थांबवण्याचा हा निर्णय घ्यावा लागला आहे. मुंबईची लोकल सेवा जवळपास ३१ मार्चपर्यंच बंद राहणार आहे. तर, मालवाहतूक काही महत्त्वाच्या कारणांमुळे सुरु ठेवण्यात येणार आहे.
रात्री बारा वाजल्यानंतर मुंबईची लोकलसेवा पूर्णपणे ठप्प होणार असल्यामुळे नागरिकांनी किमान आततरी परिस्थितीचं गांभीर्य घेत कोरोनाला रोखण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन करण्याच येत आहे. दरम्यान नागरिकांची गर्दी कमी करण्यात यश न मिळाल्यास नाईलाजाना शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला आहे.