जिल्हयात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज -पालकमंत्री गुलाबराव पाटील
विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन


जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपन
जळगाव: विकासाची गती कायम ठेवतानाच पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची काळजी घेणे ही शासनासोबतच समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. वाढते सिमेंटीकरण, वृक्षतोड आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाची व्यापक लोकचळवळ उभारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा नियोजन समिती सभागृहात, जळगाव महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅन प्रकाशन तसेच विविध उपक्रमांच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मनपा आयुक्त आदित्य जीवने, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती चंद्रशेखर पाटील, विविध प्रभागांचे नगरसेवक उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते महानगरपालिकेच्या 22 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र व गणवेश वाटप करण्यात आले. तसेच राज्य शासनाकडून प्राप्त रोड स्विपींग मशीनचे अनावरण, महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील चारचाकी सहा वाहनाचे उद्घाटन सोहळाही मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
पालकमंत्री श्री.पाटील म्हणाले, निर्सगाचे काळजी घेण्यासाठी वृक्षारोपन करणे आवश्यक असून आगामी पाच वर्षांत १७ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. मात्र केवळ वृक्षलागवड न करता लावलेली वृक्ष शेवटपर्यंत जगविणे अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिक, लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, तरुण आणि स्वयंसेवी संस्थांनी आपल्या परिसरातील झाडे जगविण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन पालकमंत्री श्री.पाटील यांनी केले. प्रशासनाच्या प्रयत्नांना नागरिकांचा सहभाग मिळाल्याशिवाय पर्यावरणाच्या संवर्धनाची चळवळ यशस्वी होणार नाही.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विकासासोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. हवामान बदल, वाढते तापमान, अवकाळी पाऊस, पूर आणि उष्णतेच्या लाटा यांचा सामना करण्यासाठी वृक्षलागवड, हरित क्षेत्र वाढविणे आणि पर्यावरणपूरक उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ‘हर घर तिरंगा’ अभियान गाव, वाडी, वस्ती आणि पाड्यांपर्यंत पोहोचवून त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहनही श्री.महाजन यांनी केले. विकास आणि आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेत पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले.
आमदार सुरेश भोळे म्हणाले, प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्षलागवड करून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, शाळकरी विद्यार्थ्यांना वृक्षलागवडीशी जोडून प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या झाडाचा दरवर्षी ‘वाढदिवस’ साजरा करण्याचा उपक्रम राबविण्याची सूचना केली.
महापौर दीपमाला काळे यांनी जळगाव महानगरपालिकेच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी हिट ॲक्शन प्लॅन व क्लायमेट ॲक्शन प्लॅनची अंमलबजावणी सुरू असल्याचे सांगितले. शहरातील विविध प्रभागांमध्ये ‘हीट इफेक्ट पेंट’चा वापर करण्यात आला असून, वृक्षलागवड, हरित क्षेत्र आणि ग्रीन कॉरिडॉर वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. ‘हरित जळगाव, सुरक्षित जळगाव, स्वच्छ जळगाव आणि निरोगी जळगाव’ हे सामूहिक ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यावेळी म्हणाले, जिल्ह्यात पर्यावरण संवर्धन आणि शहरी भागातील वाढते तापमान कमी करण्यासाठी व्यापक वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत असून, एका वर्षात सव्वा चार लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
जिल्ह्यात ‘हर घर तिरंगा’ सप्ताहालाही सुरुवात झाली असून, सप्ताहभर बाइक व सायकल रॅली, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा, यासाठी विविध ठिकाणी स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. जिल्हा परिषद, महानगरपालिका, आरोग्य विभाग तसेच संबंधित विभागांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असून, पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि हवामान बदलाच्या परिणामांवर नियंत्रणासाठी नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
प्रास्ताविकात, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅन संदर्भात माहिती देतांना म्हणाले, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी स्वच्छ हवा, शुद्ध पाणी आणि सार्वजनिक हिरव्या जागा आवश्यक असून, स्थानिक हवामान, तापमानवाढीचा धोका, असुरक्षित लोकसंख्या आणि शहराची हवामान बदलाशी सामना करण्याची क्षमता यांचा अभ्यास करून हा क्लायमेट ॲक्शन प्लॅन तयार करण्यात आला आहे. वृक्षलागवडीसोबत स्थानिक परिस्थितीला अनुरूप वृक्षांची निवड, संवर्धन, जलसंधारण व पावसाच्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन यावर भर देण्यात येणार असून, हा आराखडा केवळ दस्तऐवज न राहता त्याची प्रभावी अंमलबजावणी होणे महत्त्वाचे आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते बचत गटाच्या ध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. दरम्यान शहरातील विविध प्रभागांसह फॉरेस्ट व नक्षत्र बाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









