चाळीसगाव तालुक्यात नागरिकांच्या आमरण उपोषणाला सुरुवात
चाळीसगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील सायगाव ग्रा.प. अंतर्गत सन २०१५ ते २०१९ या कालखंडात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत संगनमताने झालेल्या आर्थिक भ्रष्टाचाराची इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची विशेष तांत्रिक समिती गठीत करून निष्पक्ष व पारदर्शक चौकशी व्हावी, चौकशीअंती निष्पन्न दोषीं विरोधात कायद्यानुसार कारवाई करावी, या मागणीसाठी भाऊसाहेब हिरामण रावते आणि सतीश त्र्यंबक रोकडे या नागरिकांनी प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत मौजे सायगाव ता. चाळीसगाव येथील ग्राम आरोग्य पोषण, पाणी पुरवठा स्वच्छता समिती व कॉन्ट्रॅक्टर यांनी भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम केले. विकासकामांवर खर्च न करता परस्पर पैसे हडप केले असे आरोप करून नागरिक उपोषणाला बसले आहेत. सायगाव ग्रामपंचायत राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामात साई भूमी कॉन्ट्रॅक्टर, चाळीसगाव आणि ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा स्वच्छता समितीने सन २०१५ ते २०१९ मध्ये समिती वॉटर फिल्टरचे निकृष्ट दर्जाचे काम करून परस्पर मागील ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी आपल्या नातेवाईकाच्या नावे चेक द्वारे परस्पर कोणतेही काम न करता पैसे हडप केले आहेत.
सदर ग्राम आरोग्य पोषण व पाणी पुरवठा स्वच्छता समितीने हडप केलेली रक्कम वसूल करून दोषींवर कारवाई होण्यासाठी दि. २६ रोजी पासून सायगाव ग्रामपंचायतसमोर नागरिक भाऊसाहेब हिरामण रावते आणि सतीश त्र्यंबक रोकडे उपोषणाला बसले आहेत.