मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनानं सामान्य जनतेसाठी एक रुपयांचंही पॅकेज जाहीर केलेलं नाही. राज्यातील जनता करोनाशी सामना करीत असताना शासनाने 50 हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करावं, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात केली.
राज्य शासन कोरोना संसर्ग निवारणामध्ये अपयशी ठरलं असल्याने त्या विरोधात आज भाजपच्यावतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. कोरोनाचा प्रसार थांबवणं ही राज्य सरकारची जबाबदारी होती पण त्यामध्ये ते अपयशी ठरले आहेत. महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्यात पहिला रुग्ण दिसला ती वेळ आणि आत्ताची तुलना करता रुग्णांची संख्या पाहिली तर मोठा फरक दिसतो, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.
राज्य शासन कोरोना संसर्ग निवारणासाठी काहीच करणार नाही आणि विरोधकांना सहकार्य करा असं सांगणं हे देखील बरे नाही. आत्तापर्यंत राज्य शासनाने लोकांसाठी कसलीही मदत केलेली नाही. स्वस्त धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य हे केंद्र शासनाच्या माध्यमातून दिले जात आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलंय.
राज्यात पोलिसांवर 250 ठिकाणी हल्ले झाल्याची नोंद आहे. 1400 पोलिसांना बाधा झाली आहे. पंधरा पोलीस कर्तव्यावर असताना मृत्यू पावले आहेत. त्यामुळे राज्याच्या आयुक्तांना पोलिसांसाठी संरक्षण द्यावे, अशी मागणी करावी लागली. हे सर्व शासनाचं लोक बोलत आहेत, हे ही लक्षात घेतलं पाहिजं, अशा शब्दांत त्यांनी शासनाला कोडींत पकडण्याचा प्रयत्न केलाय.