नवी दिल्ली : 23 ऑगस्ट 2023 ही तारीख भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. या दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 यशस्वीपणे उतरवून इतिहास रचला.
आता हा आनंद द्विगुणित करण्यासाठी इस्रो एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. चांद्रयान-3 नंतर इस्रो आता चांद्रयान-4 मोहीम यशस्वी करण्यात व्यग्र आहे.
चांद्रयान-4 बाबत इस्रोची योजना काय आहे, याबाबत संस्थेचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी माहिती दिली आहे. इस्रोचे प्रमुख सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान-4 चंद्रावरून नमूने घेऊन पृथ्वीवर परत येईल, अशा पद्धतीने डिझाईन केलं जातं आहे. ते एकाच वेळी लाँच होणार नाही. या अंतराळयानाचे दोन भाग दोन प्रक्षेपकांद्वारे चंद्राच्या कक्षेत पाठवले जातील. चंद्रावर उतरण्यापूर्वी या यानाची अवकाशातच जोडणी होईल.