जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुसुंबा येथे इलेक्ट्रिक डीपीच्या विजेच्या धक्क्याने रस्त्याने जाणाऱ्या तीन म्हशी जागीच ठार झाल्याची घटना रविवारी १२ नोव्हेंबर रोजी घडली आहे. यात शेतकऱ्याचे अंदाजे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिसात नोंद करण्यात आली.
जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील रहिवासी रवींद्र गुलाब पाटील (वय-४१) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीसोबत ते म्हशी पालनाचा जोड व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. दैनंदिनी प्रमाणे रविवारी १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता ते त्यांच्या मालकीच्या ३ म्हशी घेऊन शेतात चरण्यासाठी नेत होते. त्यावेळी रस्त्यावरील इलेक्ट्रिक डीपी जवळून म्हशी जात असतांना त्यांना वीजेचा धक्का लागल्याने तीन म्हशी जागीच ठार झाल्या. दरम्यान हे घटना घडल्यानंतर कुसुंबा गावाचे पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांनी धाव घेवून पाहणी केली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली.
पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून जेसीबीच्या माध्यमातून म्हशींचे मृतदेह दफन करण्याचे काम सुरू होते. याबाबत एमआयडीसी पोलिसात नोंद घेण्याचे काम सुरू होते. दरम्यान महावितरण कंपनीच्या भोंगळ कार्ड कारभारामुळे रविंद्र पाटील या शेतकऱ्याचे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे महावितरणकडून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी देखील पोलीस पाटील राधेशाम चौधरी यांनी केली आहे.