अधिकाऱ्यांना घटनेचे गांभीर्यच समजले नाही ?
जळगाव / बुलढाणा (प्रतिनिधी) : मानवी आरोग्यास धोकादायक असल्याने विक्री, साठवणीसाठी प्रतिबंधित असलेल्या मांगूर जातीच्या तीन टन मासळीची वाहतूक करणारा ट्रक बुलढाणा जिल्ह्यात अकोट-शेगाव रोडवर पोलिसांनी शुक्रवारी २८ जुलै रोजी पकडला. शासकीय अधिकाऱ्यांनी त्यामधील मासळी गौलखेड रोडवरील शेगाव पालिकेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरात खड्डा खोदून त्यामध्ये नष्ट केली. परप्रांतातील संशयित आरोपींसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या कारवाईतून मिळालेल्या माहितीद्वारे, जळगाव जिल्ह्यात जामनेर तालुक्यातही अधिकाऱ्यांनी कारवाई केली. मात्र केवळ चौकशा करून संशयितांना सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे.
मिनी मालवाहू ट्रक (एमएच ४० सीडी २०३०) क्रमांकाचा संशयास्पद ट्रक थांबवून शेगाव पोलिस स्टेशनमध्ये आणला. चौकशी केली असता, मांगूर जातीची मासळी आढळून आली. मासळी तपासणीसाठी बुलढाणा येथे मत्स्य विभागाकडे पाठविली. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याप्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी ट्रक जप्त केला. शुक्रवारी सकाळी यामधील मासळ्या गौलखेड रोडवर असलेल्या शेगाव नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर वीस फूट खोल खड्डा करून नष्ट केल्या. वाहनचालक आकाश प्यारेलाल चौधरी (२३, रा. जबलपूर, मध्य प्रदेश) व क्लीनर रामकृष्ण नंदा व्यंकटराव (३०, रा. आंध्र प्रदेश) यांच्यासह मासळी विक्री करणारा गटासाला व्यंकटराव (रा. नेरी, ता. जामनेर, जि. जळगाव खान्देश) या तिघांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. मासे जबलपूर येथे विक्रीसाठी नेले जात होते. त्याची किंमत २ लाख ४० हजार रुपये आहे.
शेगाव येथे कारवाई झाल्यानंतर संशयित आरोपींकडून मिळालेल्या माहितीवरून अखेर जळगाव जिल्ह्यात शासकीय अधिकाऱ्यांनी जामनेर तालुक्यात कारवाई केली. चिंचखेडा शिवारात वाघूर धरणाजवळ शुक्रवारी तपासणी केली. तेथे काही लोकांची चौकशी करण्यात आली. वाघूर धरणापाशी ४३ शेततळे आंध्रप्रदेशच्या काही लोकांनी तयार केलेले आहेत. या तळ्यात मांगूर माशांचे उत्पादन घेतले जात असल्याची माहिती मिळत आहे. या मांगूर माशांसाठी खराब मांस, पिसे आणले जाते. त्यानंतर ते मांगूर माशांचे घाणेरडे पाणी वाघूर धरणात सोडले जाते, अशी माहिती नागरिकांनी शासकीय आस्थापनांना वेळोवेळी दिलेली आहे.
हिंगणे, चिंचखेडा ग्रामस्थांनी याबाबत शासनाचे अनेक वेळ लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्याकडे थेट दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. त्यामुळे मांगूर माशांमुळे अनेक जनजीवन धोक्यात आलेले आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. शुक्रवारी वाघूर धरणाजवळ बुडीत क्षेत्रात काही इसमांनी मांगूर माशांचे उत्पादन घेतल्याची माहिती तहसीलदारांनी मिळाली. त्याबाबत तपासणी केली. मात्र तपासणीत अधिकृत काय मिळाले याबाबत समजले नाही. जामनेरचे तहसीलदार नाना आगळे, पोलीस स्टेशनचे निरीक्षक किरण शिंदे, जिल्हा मत्स्य अधिकारी, तापी पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी यांनी शुक्रवारी पाहणी केली आहे.