जोवर कर्म सत्ता आहे तोवर धर्म, आराधना, साधना करा. या गोष्टी करण्यासाठी उत्तम काळ कोणता याबाबत मोलाचे विचार सर्व भक्तांचे आस्था असलेले प्रखर वक्ता प.पू. गुलाब मुनी म.सा यांनी आजच्या प्रवचनात व्यक्त केले. जोवर आजारपण, म्हातारपण येत नाही सर्व इंद्रिये व्यवस्थित, उत्तम कार्य करतात तोवर धर्म आराधना करणे क्रमप्राप्त आहे. शांती, समाधीने जगायचे असेल आणि दुर्गतीत जायचे नसेल तर दुसऱ्यावर दोषारोप करणे, शिवीगाळ करणे, वाईट बोलणे इत्यादी सोडून द्यावे असे आवाहन श्रावक-श्राविकांना केले.
शारिरीक, मानसिक, पारिवारीक आणि आर्थिक संकटे येत असतात, कर्मबंधात सावधानता न बाळगल्याने अशा दुःखांचा उदय होतो. मन, वचन आणि काया हे कर्मबंधाची साधने आहेत. त्यामुळे या साधनांचा उपयोग सुयोग्यच व्हावा. आपण आज जो व्यवहार करतो त्याचा भविष्यात चांगला वा वाईट परिणाम होतो. वर्तमान सुधारला तर भविष्य देखील सुधारते ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी. दुसऱ्यांबद्दल कुणाकडेही वाईट बोलू नये, भोजन करताना मौन ठेवावे, कोणत्याही परिस्थितीत आपल्या चेरऱ्यावर सतत प्रसन्नता ठेवावी, तुमच्या वयापेक्षा लहान व्यक्तींशी प्रेमाने वागावे. हे आपले वर्तन आधी सुधारावे. हल्लीच्या काळात गंभीरता, ध्यैर्य आणि सहनशीलता कमी कमी होत आहे. स्वतःच याबाबत आत्मपरीक्षण करून आपले लक्षण बदलले तर उत्तम होईल याबाबत दैनंदिन व्यवहाराचे उदाहणे त्यांनी सांगितले.
प्रवचन मालेतील प.पू. कैलास मुनी म.सा. यांनी क्रोधावर विजय किंवा नियंत्रण कसे मिळवावे याबाबत सात उपायांची प्रवचनात चर्चा केली. क्रोध आला की त्वरेने मौन धारण करावे, उलटा नवकार मंत्र जपावा आणि उलट पद्धतीने लोगस्स वाचन करावे. तुमचे मन प्रतिकूल भावन जपत असेल तर धमकी, रुबाब किंवा वात्सल्य भाव तुमच्या मनात येतात? तुम्ही नेमके कसे वागतात याबाबत स्वतःच स्वतःचे परीक्षण करून घ्यावे. मोहनीय कर्माचा उदय झाला की राग येतो. स्वभावाबद्दल ७ प्रकारचे प्रश्न स्वतःला विचारावे. प्रतिकूलतेत आपण कसे वर्तन करतो याबद्दल देखील नक्की चिंतन करावे, आत्मपरीक्षण करावे असे ही विचार प.पू. कैलास मुनी म.सा यांनी व्यक्त केले.