जळगाव (प्रतिनिधी) – खारघर, मुंबई येथे महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या आयोजनामध्ये गंभीर त्रुटी व ढिसाळ नियोजन यामुळे अनेक लोकांचे प्राण गेले, मोठ्या प्रमाणात जखमी झाले. कार्यक्रमाच्या दरम्यान झालेल्या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या शासन व स्थानिक संयोजक आणि ज्यांनी श्री भक्तांना गैरसोईच्या वेळेत आपल्या पुरस्कार सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन केले त्यांचे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर स्थापित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जाहीर निषेध करत आहे. महाराष्ट्र शासन, त्याचे प्रशासन व पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि श्री परिवाराचे प्रमुख पदाधिकारी यांनीही जबाबदारी घेऊन झालेल्या घटनेच्या बद्दलच जाहीर माफी मागावी, अशी मागणी अंनिसने केली आहे.
या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींना आदरांजली, त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात समिती सहभागी आहे. केंद्रीय गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, अनेक मंत्र्यांच्या अधिकान्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झालेला आहे. संपूर्ण शासकीय यंत्रणा या कामाला लावली होती, शासनाचे सर्व विभाग या कामात सक्रीय होते. शासनात असणाऱ्या नेत्यांनी एका व्यक्तीसाठी, स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी हा कार्यक्रम भर उन्हात ठेवला. सरकारी तिजोरीतून करोडो रुपये खर्च केले, ही बाब चिंतनीय आहे. ही दुर्घटना घडली याची जबाबदारी कोणाची? असाही सवाल महाराष्ट्र अंनिसने केला आहे.
महाराष्ट्र शासन, त्याचे प्रशासन व पोलीस, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि श्री परिवाराचे प्रमुख पदाधिकारी यांनीही जबाबदारी घेऊन झालेल्या घटनेच्या बद्दलच जाहीर माफी मागावी. महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रम महाराष्ट्रासाठी भूषणावह ठरला नाही हे नक्की. शासनाने करोडो रुपये खर्च करून हा कार्यक्रम घेण्याची खरच गरज होती का? संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लावून सरकारने हा पुरस्कार सोहळा पक्षीय पुरस्कृत सोहळा केला हे लोकांच्या लक्षात आले आहे. सदर या घटनेमध्ये ज्या व्यक्तींचा मृत्यू झालाय तो उष्माघातानी झाला असला तरी त्या कार्यक्रमाच्या संयोजकांच्या अक्षम्य बेजबाबदारपणामुळे ही घटना घडली आहे. आता या घटनेचे उत्तरदायित्व कोण घेणार? आणि या घटनेत जबाबदार असल्याचे सरकारी यंत्रणा, प्रशासन, पोलीस स्वतःवरच गुन्हा दाखल करायची हिंमत कदाचित बाळगणार नाहीत पण किमान नैतिक जबाबदारी स्वीकारून तमाम महाराष्ट्रवासियांची माफी मागावी. ही मागणी समिती करत आहे.
धर्माधिकारी यांची कार्यपद्धती अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी
आप्पासाहेब धर्माधिकारी यांची कार्यपद्धती अध्यात्म आणि धर्माच्या आडून अंधश्रद्धांना खतपाणी घालणारी वादग्रस्त ठरली आहे. कौटुंबिक ट्रस्टच्या माध्यमातून कॉर्पोरेट सामाजिक कामाच्या निमित्ताने राजकीय लोकांना भुरळ घालून स्वहित साधणारी ठरली आहे. राजकीय पुढाऱ्यानीही अशा ठिकाणी आपली उपस्थिती लावून बुवांचे महत्व वाढवले जात आहे. त्यांना गाडगे महाराजांच्या स्वच्छतेच्या, आणि तुकडोजी महाराजांच्या ग्राम विकासाच्या कामाचा विसर पडल्याचे दिसून येते. याबाबत समिती नेहमी बोलते आहे, प्रबोधन करत आहे. यानिमित्ताने धर्माधिकारी, त्यांचा श्री परिवार यांच्या कामाची चिकित्सा केली पाहिजे. आपले भक्त मृत्युमुखी पडले त्यांच्या कुटुंबियांना आप्पासाहेब जाऊन भेटले का? या दुर्घटनेची संयोजक, स्थानिक संयोजक व ज्यांनी श्री भक्तांना निमंत्रित केले ते याची नैतिक जबाबदारी स्वीकारतील का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो.