जळगाव (प्रतिनिधी) – सरपंचपद रद्द होण्यासाठी अर्ज केल्याच्या रागातून तालुक्यातील कानळदा येथे एकाला ६ जणांनी बेदम मारहाण करून चाकूने हातावर वार करून जखमी केल्याची घटना घडली आहे. तालुका पोलीस ठाण्यात रविवार २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कानळदा गावात राहणारे आनंद सपकाळे यांनी गावातील सरपंच पुंडलिक सपकाळे यांच्या विरोधात तक्रार दिली होती. यात सरपंचपद रद्द करावे, अशी मागणी करणारा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. याचा राग मनात ठेवून निखिल संतोष सपकाळे, विलास नारायण सपकाळे, पुंडलिक तुळशीराम सपकाळे, प्रमोद मधुकर चव्हाण, राजू मिस्तरी आणि नारायण शंकर सपकाळे सर्व रा. कानळदा यांनी आनंद सपकाळे यांचा भाचा चेतन विजय साळुंखे वय २५ रा. कानळदा ता.जि.जळगाव या तरुणाला छोट्या चाकूने मारून गंभीर दुखापत केली, तर इतरांनी चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या संदर्भात रविवारी २ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात जमाव बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहे.