जळगाव (प्रतिनिधी) – येथील जिल्हा कारागृहात कैद्यांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक वाढली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. क्षमतेपेक्षा दीडपट कैदी कारागृहात असल्यामुळे कारागृह प्रशासनावर ताण पडत आहे. भुसावळ येथे मागील वर्षी कारागृहासाठी जागा पाहण्यात आली होती. मात्र सध्या त्याकडे प्रशासनासह जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचेही दुर्लक्ष झाले असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून गुन्हेगारी वाढत आहे. पोलिसांचे गुन्हेगारांवर अंकुश असले तरीही गुन्हे मात्र थांबत नाहीत, हि पोलिसांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या जिल्ह्यात धरणगाव तालुक्यातील पाळधी, अमळनेर, यावल तालुक्यातील अट्रावल अशा तीन ठिकाणी दंगलीचे गुन्हे दाखल झाले. अट्रावल येथे २०५ संशयितांवर गुन्हे दाखल झाले आहेत. पाळधी व अमळनेर येथेही गुन्हे दाखल आहेत. कारागृहात रवानगी होणाऱ्या कैद्यांची संख्या वाढत आहे.
जळगाव जिल्हा कारागृहात २०० कैद्यांची क्षमता आहे. यात १८६ पुरुष व १४ महिला कैद्यांसाठी राखीव आहेत. मात्र सध्या महिला व पुरुष मिळून ५०८ कैदी कारागृहात आहेत. या कैद्यांचे दैनंदिन नियोजन करताना कारागृह प्रशासनाची दमछाक होताना दिसत आहेत. मात्र जिल्हा प्रशासन आणि जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे या समस्येकडे अजून तरी लक्ष गेलेले नाही. जिल्हा कारागृह अधीक्षकांनी याबाबत प्रशासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केलेले आहेत. मात्र हे पत्रव्यवहार केवळ औपचारिक ठरत आहे.
कारागृहाकरिता भुसावळ येथे मागे प्रशासनाने जागा बघितली होती. मात्र पुढे त्याची काहीही कार्यवाही झालेली नाही. याकडे देखील प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.