महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे आयोजन
जळगाव (प्रतिनिधी) – शहरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त “व्यसनमुक्त महाराष्ट्र, गांजामुक्त महाराष्ट्र” या घोषवाक्याखाली रॅली काढण्यात आली. रॅलीत विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीविरुद्ध घोषणा दिल्या. महाराष्ट्रातील व्यसनांचे प्रमाण कमी होण्याविषयी मान्यवरांनी अपेक्षा व्यक्त केल्या.
येथील चेतना व्यसनमुक्ती केंद्रातर्फे व्यसनमुक्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात गांजा सापडण्याचे प्रमाणदेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे यंदा “व्यसनमुक्त महाराष्ट्र, गांजामुक्त महाराष्ट्र” या घोषवाक्याखाली रॅली काढण्यात आली. रॅलीत विविध सामाजिक संस्थादेखील सहभागी झाल्या होत्या.
सकाळी आ. राजूमामा भोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस एजाज मलिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रॅलीला हिरवी झेंडी दाखवण्यात आली. यानंतर विविध घोषणा लिहिलेले फलक घेऊन सुमारे १ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आम्ही व्यसन करणार नाही आणि कुणालाही करू देणार नाही, तसेच दारू सोडा संसार जोडा, नशामुक्त महाराष्ट्र, गांजा मुक्त महाराष्ट्र, देश बनेल नवा ,जेव्हा नशामुक्त असेल युवा अशा घोषणा देण्यात आल्या. रॅली शिवतीर्थ, क्रीडा संकुल, नवीन बस स्थानकमार्गे महात्मा गांधी उद्यान या ठिकाणी विसर्जित झाली.
उद्यानात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला संचालक नितीन विसपुते यांनी माल्यार्पण केले. येथे नितीन विसपुते यांनी व्यसनमुक्तीविषयी माहिती दिली. मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयाचे सहकार्य लाभले. रॅलीत निसर्ग मित्र समितीचे अध्यक्ष प्रवीण पाटील, मराठी विद्यान परिषदेचे सचिव प्रा. दिलीप भारंबे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रा. दिगंबर कट्यारे, परिवर्तन संस्थेचे शंभू पाटील, डॉ राजेंद्र भालोदे, डॉ जितेंद्र कोल्हे, मुक्ती हारून नदवी, सतीश देशमुख, डॉ. अमित चित्ते, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, प्रा. निलेश चौधरी, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे वासुदेव पाटील, मनिषा पाटील, ज्ञानेश्वर कोळी आदींनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रतीक सोनार, सागर डेरे, जितेंद्र दुसाने, अमोल पाटील, आशुतोष चितळे, राम लखपती, हेमंत लखानी, योगेश नेहते , गजानन निमकर, गणेश गायकवाड, गणेश भांबळे, श्याम वायस्कर आदींनी मेहनत घेतली.