नाशिक ( प्रतिनिधी ) – ट्रॅक्टरसह ट्रॉली उलटून कारवर आदळल्यामुळे झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मयत आणि जखमी हे पारोळा, जामनेर आणि भडगाव तालुक्यातील रहिवासी असून नऊ जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भिती आहे.
रस्त्याच्या कामासाठी मजुरांना घेऊन चाललेल्या ट्रॅक्टरचा काल सायंकाळी भीषण अपघात झाला. वणी-कळवण रस्त्यावर मुळाणे घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह कारवर उलटून हा अपघात झाला. सहा मजूर ठार झाले. १६ जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात पारोळा तालुक्यातील उंदिरखेडे येथील पवार कुटुंबातील तीन सदस्य ठार झाले असून पाच जखमी झाले आहेत. हे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह भागवत असे. रस्ते कामासाठी बाहेर जाणार्या या कुटुंबावर काळाचा आघात झाला आहे. यात सरला आणि वैशाली बापू पवार या चार वर्षांच्या जुळ्या मुली मृत्यूमुखी पडल्या. पोपट गिरीधर पवार (वय ४०) यांचा देखील मृत्यू झाला. पारोळा तालुक्यातीलच अंजनेरा येथील मोरे कुटुंबावरही यात वज्राघात झाला. यामध्ये रामदास बळीराम मोरे ( वय ४८); आशाबाई रामदास मोरे ( वय ४०) आणि बेबाबाई रमेश गायकवाड ( वय ४० ) या तिघांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
जखमीमध्ये बापू पवार (वय ४५, रा. उंदीरखेडा, ता. पारोळा,); सुवर्णा पवार (वय १३, रा. उंदीरखेडा), विशाल पवार (वय ११, रा. उंदीरखेडा), आकाश पवार (वय १५, रा. उंदीरखेडा), सागर गायकवाड (वय २३, रा.अंजनेरा), सुरेखा शिंदे (वय २२, रा.हिंगोणा), संगीता पवार (वय ४५, रा. उंदीरखेडा), लक्ष्मण शिंदे (वय २१, रा. हिंगोणा), तनू गायकवाड (वय ३, रा.कुसुंबा), दीपक गायकवाड (वय ३०, रा. कुसुंबा) , अनुष्का गायकवाड (वय १, रा. कुसुंबा), मनीषा गायकवाड (वय २४, रा. कुसुंबा), गणेश पवार (वय ७, रा.उंदीरखेडा), प्रिया म्हस्के (वय ३, रा.जामनेर), अजय बोरसे (वय २, रा. मिराड), यांचा समावेश आहे.