सोलापूर ( प्रतिनिधी ) – राज्यात 7 हजार पदांची पोलीस भरती होणार असतानाच आणखी आता देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घोषित झालेली 60 हजार पदांची मेगाभरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे वित्त विभागाने पदभरतीवरील सर्व निर्बंध उठविले असून आता सर्व विभागांनी त्यांच्याकडील मंजूर व रिक्तपदांच्या आकृतीबंधास मान्यता घेऊन पदभरती सुरु करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.
सद्यस्थितीत सरकारच्या 34 प्रमुख विभागांमध्ये दोन लाखांवर पदे रिक्त आहेत. एकूण रिक्त पदांच्या 50 टक्के पदांच्या वेतनावरील खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात किमान लाखभर पदांसाठी मेगाभरतीची प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारी विभागांमध्ये मागील सहा वर्षांत मोठी पदभरती झालेली नाही. आता गृह विभागात जवळपास 18 हजार, जलसंपदा विभागात 15 हजार, पशुसंवर्धन, कृषी, मराठी राजभाषा विभाग, महसूल, भूमीअभिलेख, पुरवठा विभाग, शिक्षण अशा विभागांमध्ये रिक्त पदांची संख्या वाढली आहे.
कोरोनाकाळात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेकजण नोकरीच्या शोधात आहेत. पोलीस भरती होण्यासाठी अनेकजण काही महिन्यांपासून मैदानात घाम गाळत आहेत. ही भरती प्रक्रिया केवळ पोलीस कॉन्टेबल या पदासाठी पार पडणार आहे. एक ते दीड महिन्यात ही भरती प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. आता हा दुसरा टप्पा हा सात हजारांचा असणार आहे. तिसरा टप्पा हा दहा हजारांपेक्षा जास्त पदांसाठी भरती होऊ शकते