जळगाव ( प्रतिनिधी ) – चाळीसगाव तालुक्यातीलपातोंडा, मुंदखेडे, चितेगाव, ओढरे, कोदगावच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आले आहे . प्रलंबित भूसंपादन प्रस्तावांसाठी राज्य सरकारने अर्थसंकल्पात २५० कोटींची तरतूद केली आहे .
अनेक वर्षांपासून पातोंडा – मुंदखेडे, चितेगाव, ओढरे, कोदगाव प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना न्यायालयाने निकाल देऊन व शेतकऱ्यांनी महामंडळाशी तडजोडी करूनदेखील संपादित जमिनींचा मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु आहे. काही महिन्यांपूर्वी पातोंडा येथील भाजपा पंचायत समिती गटनेते संजय पाटील यांच्यासह २०० हून अधिक शेतकऱ्यांनी जळगाव येथे आमरण उपोषण सुरु केले होते. त्यावेळी आमदार गिरीष महाजन यांनी भेट देऊन शेतकऱ्यांचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी बोलणे करून दिले होते. आमदार गिरीष महाजन व शेतकऱ्यांनी त्यावेळी आक्रमक भूमिका घेतल्याने जलसंपदामंत्री यांनी मुंबई येथे बैठक बोलावण्याचे आश्वस्त केले होते. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबई येथे मंत्रालयात चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा मुंदखेडे, चितेगाव, ओढरे, कोदगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीत आमदार गिरीष महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांनी आक्रमकपणे शेतकऱ्यांची बाजू लावून धरत शेतकऱ्यांनी शासनाशी तडजोड करत कोट्यावधी रुपयांच्या व्याजावर पाणी सोडले मात्र त्या शेतकऱ्यांना १ रुपयाही दिला गेला नसल्याने या बैठकीत ठोस निर्णय घेण्याचा आग्रह धरला, जलसंपदामंत्री यांनी येत्या अधिवेशनात प्रलंबित भूसंपादन प्रस्तावांसाठी २०० कोटींहून अधिक निधी देण्याचे आश्वासन दिले होते व तसा प्रस्ताव जलसंपदा विभागाने अर्थ विभागाला पाठविण्याच्या सूचनादेखील अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापी महामंडळ क्षेत्रातील प्रलंबित न्यायालयीन भूसंपादन प्रकरणासाठी २५० कोटींची तरतूद केली आहे. अनेक वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तसेच आमदार गिरीष महाजन व आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.गिरीष महाजन जलसंपदा मंत्री असताना २० वर्षांपासून प्रलंबित भूसंपादन निधीचा प्रश्न मार्गी लागून तडजोड झाली होती त्यावेळी बऱ्याच शेतकऱ्यांना पहिला हप्ता देखील प्राप्त झाला होता,नंतर शेतकऱ्यांना न्यायालयाने आदेश देऊनदेखील २ वर्षात एक रुपयाही मिळाला नव्हता. आता मात्र २५० कोटींची तरतूद झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.