जळगाव ( प्रतिनिधी ) – हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार जळगावसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील तीन-चार दिवसांपर्यंत संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यात प्रारंभी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने बर्याच शेतकर्यांना दुबार तर काहींना तिबार पेरणी करावी लागली. मध्यंतरी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताक्रांत होते. मात्र काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. जलसाठ्यांसाठी आवश्यक असणारा मुसळधार पाऊस देखील झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटण्याचे संकेत आहेत.
भारतीय हवामान खात्याने आज जारी केलेल्या अंदाजानुसार जळगावसह राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आता येत्या तीन-चार दिवसांमध्ये जळगाव जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी संततधार तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.







