जळगाव;- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. हाजी गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेला झालेल्या गर्दीला जबाबदार धरून त्यांच्या तीन मुलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील २५ मे २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय हाजी गफ्फार मलीक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. तसेच मलिक कुटुंबियांकडून कोणत्याही उपस्थितीचे आवाहन तसेच अंतिम यात्रेची मिरवणूक किंवा गर्दी जमा होण्याच्या दृष्टीने आवाहन केले गेले नव्हते. तरीही सर्वधर्मीय नागरिक व सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते स्वतःहून त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे मलिक यांचे कुटुंब जमलेल्या गर्दीत जबाबदार ठरू शकत नाही.
गफ्फार मलिक यांचे मुले एजाज अब्दुल गफ्फार मलिक, नदीम अब्दुल गफ्फार मलिक, व फैजवा अब्दुल गफ्फार मलिक सर्व रा. काट्या फाईल यांच्यावर शनिपेठ पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे. हे दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर लोकसंघर्ष मोर्चा चे प्रतिभा शिंदे, संजय पवार, ऍड. विजय पाटील, विनोद देशमुख, सचिन धांडे, मिलिंद सोनवणे, सुनील माळी, अशोक लाडवंजारी, मुकुंद सपकाळे, योगेश पाटील, मुकेश टेकवाणी, प्रमोद पाटील, मनोज वाणी, सुहास चौधरी, मूविकोराज कोल्हे, ललित बागुल, दिलीप लालापुरी, रवी देशमुख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.