नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात थैमान घातलेली कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरू लागली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात 3 लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूचे प्रमुख कारण जर्नल इंफेक्शन अँड ड्रग रेसिस्टंसमध्ये प्रकाशित झाले आहे. कोरोना काळात रुग्णांवर एँटीबायोटिक्सचा बेसुमार वापर केला जात आहे. त्यामुळे त्यांच्या शरीरात सुपरबग तयार होतो. परिणामी बॅक्टेरियल आणि फंगल इंफेक्शन वेगाने वाढत असल्याची माहिती संशोधन अहवालातून समोर आली आहे. संशोधन अहवालातील माहितीनुसार, कोरोना रुग्णांमध्ये एँटिबायोटिक्समुळे अतिरिक्त संक्रमण झाले. देशातील 60 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू याच कारणामुळे झाला. त्यामुळे 60 टक्के मृत्यूंना केवळ बॅक्टेरिया आणि फंगसमुळे तयार झालेला सुपरबग कारणीभूत ठरला. या सुपरबगची शिकार न झालेल्यांपैकी केवळ 11 टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. यातील बहुतांश जण मधुमेह आणि रक्तदाब या समस्यांचा सामना करत होते.

सूक्ष्मजीवांना निष्प्रभ करण्यासाठी एँटीबायोटिक्स वापरली जातात. मात्र एँटीबायोटिक्सचा अधिक वापर झाल्यास सूक्ष्मजीव त्यांच्याविरोधात प्रतिरोधक क्षमता विकसित करतात. त्यामुळे एँटीबायोटिक्स औषधांचा परिणाम होत नाही, अशी माहिती जर्नल इंफेक्शन अँड ड्रग रेसिस्टंसने समोर आणली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान रुग्णालयांत भरती झालेल्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शन आढळले होते. हे इंफेक्शन औषधांना निष्प्रभ करणारे सूक्ष्मजीव पसरवत होते. याची माहिती गोळा करण्यासाठी संशोधकांनी देशातील 10 रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या 17 हजार 563 रुग्णांचा अभ्यास केला. संशोधनानुसार बॅक्टेरिया आणि फंगसने संक्रमित झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या 28 टक्के होती. सूक्ष्मजीवांनी अँटीबायोटिक्स निष्प्रभ केल्याने कोरोना रुग्णांना बॅक्टेरिया आणि फंगल इंफेक्शनची लागण झाली होती. देशातील 60 टक्के कोरोना रुग्णांचा मृत्यू याच कारणामुळे झाला आहे.







