मुंबई (वृत्तसंस्था) – सध्याच्या काळात करोनाच्या महामारीमुळे अनेक लोकांना हालआपेष्टा व भूकमारी सहन करावी लागत आहे. त्यासाठी दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्री, पुणे आणि अवनी संस्था, पु णे यांच्या संयुक्त विद्यमानाने दिव्यांग, वृध्द व गरजूंना अन्नदान व आवश्यक असे अन्नधान्य देण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे.पुण्यामधील दिव्यांग अनाथ गरजू वृद्ध व गरीब लोकांना व बाहेरगावाहून शिकण्यास आलेल्या विद्यार्थ्यांना मदत म्हणून संचारबंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक गरज म्हणून जेवणाचे पाकीट (पार्सल) बनवण्याचे काम नवी पेठ येथे सुरू करण्यात आलेले आहे. दि. 27 मार्चपासून दररोज 500 लोकांनां जेवणाचे पार्सल आणि 200 लोकांना जीवनावश्यक साहित्य देण्यात येत आहे.त्या पार्श्वभूमीवर सर्व क्षेत्रातील लोकांनी, उद्योगपतींनी, व्यापारी संघटना, राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील लोकांनी व सेवाभावी संस्थांनी या कार्यास हातभार लावून देशावरती ओढवलेल्या करोना या आपत्तीवर मात करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीचे रघुनाथ येमुल व अवनी संस्थेच्या अध्यक्षा प्रा.डाॅ.निवेदिता एकबोटे यांनी केले आहे. तसेच गरजुनी संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.