मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत विविध मुद्द्यांवर बेधडकपणे मत मांडण्यासाठी ओळखली जाते. सामाजिक आणि राजकीय मुद्द्याला हात घालणाऱ्या कंगनाने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा उचलून धरत एका नवीन वादाला तोंड फोडले होते. त्यानंतर आता कंगनाने भारत-चीन संघर्षाबाबत तिचे विचार मांडले आहेत. कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत तिचे मत मांडले आहे.

गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीनंतर अभिनेत्री कंगना रणौतने देखील #BoycottChineseProduct या अभियानात उडी घेतली आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत भारतीयानं चिनी उत्पादनं आणि कंपन्यांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.
या व्हिडीओमध्ये कंगना असं म्हणाली आहे की, ‘जर कुणी आपली बोटं कापण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या हातापासून तळवा कापण्याचा प्रयत्न केला तेव्हा किती कष्ट होतील? तेवढेच कष्ट चीनने आपल्याला दिले आहेत लडाखवर त्यांची लालची नजर टाकून आणि त्याठिकाणी आपल्या देशाची इंच-इंच सीमा वाचवताना देशाचे 20 जवान शहीद झाले. काय तुम्ही विसरू शकाल त्यांच्या आईचे अश्रू, त्यांच्या विधवांची किंकाळी आणि मुलांनी दिलेले बलीदान? असा विचार करणे योग्य आहे का की सीमेवर जी लढाई होते ती केवळ सैन्याची असते किंवा सरकारची असते? आपलं त्यामध्ये काहीच योगदान नाही?
(काय आहे सुशांत आणि सिया कक्कर आत्महत्येचं कनेक्शन? कुटुंबीयांची धक्कादायक माहिती)
यावेळी कंगनाने गांधीजींच्या स्वदेशी चळवळीची देखील आठवण करून दिली आहे. ती असं म्हणाली आहे की, ‘हे जरूरी नाही का की या लढाईमध्ये आपण भाग घेतला पाहिजे? कारण लढाख हा केवळ जमिनीचा तुकडा नाही तर भारताच्या अस्मितेचा प्रश्न आहे.’
आपल्या सेनेला आणि सरकारला सहकार्य करण्यची गरज आहे. तसच चिनी सामानावर बहिष्कार टाकून आणि या लढाईत सहभागी होऊन भारताला जिंकवण्याचे आवाहन कंगनाने केले आहे.







