जळगावातील मंदिरातून पितळी कळस चोरी
जळगाव : शहरातील देवीदास कॉलनी परिसरातील महादेव व साईबाबा मंदिरातून दोन पितळी कळस चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या चोरीत सुमारे ३६ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, देवीदास कॉलनी परिसरातील कृपाळू शिव साई देवस्थानातील महादेव व साईबाबा मंदिरावर लावण्यात आलेले दोन पितळी कळस अज्ञात व्यक्तीने चोरून नेले. ही घटना १५ ऑगस्टच्या रात्री नऊ वाजेपासून १६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.
मंदिरातील सुमारे ६० किलो वजनाचे दोन पितळी कळस, अंदाजे ३६ हजार रुपये किमतीचे, चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी विवेक अनिल जगताप (वय ४८, व्यवसाय व्यापार, रा. नंदा संकुल, देवीदास कॉलनी, जळगाव) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील करीत आहेत.








