अवजड वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू


बांभोरी पुलाजवळ ॲक्टीव्हास्वाराचा जागीच मृत्यू; अपघातांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संताप
जळगाव | प्रतिनिधी
तरसोद ते पाळधी बायपास मार्गाची दुरवस्था झाल्याने अवजड वाहतूक पुन्हा जळगाव शहरातून वळविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील जुन्या महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच असून, गुरुवारी (२० ऑगस्ट) सकाळी बांभोरी पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात ॲक्टीव्हास्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इच्छादेवी चौक परिसरातील रहिवासी योगेश महाजन हे गुरुवारी सकाळी ॲक्टीव्हा वाहनावरून जात होते. सकाळी सुमारे सात वाजेच्या दरम्यान बांभोरी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीला अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. अपघाताची तीव्रता एवढी होती की, योगेश महाजन यांचा जागीच मृत्यू झाला.
तरसोद-पाळधी बायपास मार्गाची अवस्था खराब असल्याने या मार्गावरील वाहतूक शहरातून वळविली जात असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. परिणामी शहरातील जुन्या महामार्गावर अवजड वाहनांची संख्या वाढली असून, विविध ठिकाणी अपघातांच्या घटना घडत आहेत.
काही दिवसांपूर्वी अजिंठा चौफुलीजवळ भाजी विक्री करणाऱ्या महिलेचा टँकरच्या धडकेत मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गावरील अपघातांना आळा बसलेला नाही.
शहरातील वाढती अवजड वाहतूक आणि त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तरसोद-पाळधी बायपासची दुरुस्ती करून अवजड वाहतूक पुन्हा शहराबाहेर वळवावी, तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाय करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.शहरातील आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजना करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.








