चाळीसगाव तालुक्यात घरातील वादातून पतीची हत्या; पत्नीसह मुलावर गुन्हा दाखल


सायकलच्या पंपाने डोक्यात वार करून दोरीने आवळला आवळला गळा; आंबेहोळ येथील घटना
चाळीसगाव विशेष प्रतिनिधी
गहाण ठेवलेली दुचाकी सोडवण्यासाठी पैसे मागण्यावरून झालेल्या घरगुती वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याची धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील आंबेहोळ येथे घडली आहे. या प्रकरणी पत्नी आणि मुलाने मिळून पतीची हत्या केल्याचा आरोप असून, चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करणसिंग रामसिंग वंजारी (वय ४५, रा. आंबेहोळ, ता. चाळीसगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस पाटील रमेश चरणसिंग राठोड यांच्या फिर्यादीवरून अरुुणाबाई करणसिंग वंजारी (पत्नी) आणि विशाल करणसिंग पवार/वंजारी (मुलगा) या दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अशी घडली घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास आंबेहोळ येथील राहत्या घरी ही घटना घडली. करणसिंग वंजारी यांनी गावातील एका इसमाकडे आपली दुचाकी गहाण ठेवली होती. ती गाडी सोडवण्यासाठी पैसे मागण्याच्या कारणावरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर झटापटीत झाले.
दरम्यान, मुलगा विशाल याने वडिलांच्या डोक्यात सायकलमध्ये हवा भरण्याचा पंप मारला. यामुळे करणसिंग खाली कोसळले. त्यानंतर पत्नी अरुणाबाई आणि मुलगा विशाल या दोघांनी मिळून दोरीने गळा आवळून करणसिंग यांची हत्या केली.
तपासाची चक्रे फिरली
घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल राजपूत करत आहेत.









