वाघारी येथे मोबाईल टॉवरवरून ५० हजारांचे साहित्य लंपास; जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल


जामनेर (जि. जळगाव): तालुक्यातील वाघारी परिसरातील ‘इंडस इंडस्ट्रीज’च्या मोबाईल टॉवरवरून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५० हजार रुपये किमतीची उपकरणे आणि पॉवर केबल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाघारी शिवारात ‘इंडस इंडस्ट्रीज प्रा. लि.’ कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. या टॉवरवर बसवलेले जिओ कंपनीचे नेटवर्कशी संबंधित विविध महागडे साहित्य चोरट्यांचे लक्ष्य ठरले. दिनांक २० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी टॉवरवर चढून तेथील ३० हजार रुपये किमतीचे ५G ७०० BAND RRH, ५ हजार रुपयांचे SFP SIPRI 2T2R उपकरण तसेच ५० मीटर लांबीची पॉवर केबल आणि सिपरी केबल असा एकूण ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला व केबल तोडून नुकसान केले.
टॉवरवरील साहित्य चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर अमोल चरणदास शेंदरे (वय ३४, रा. खोटे नगर, जळगाव; मूळ रा. दलितपूर, जि. वर्धा) यांनी जामनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) आणि ३२४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार आणि ग्रेड पोलीस उपनिरीक्षक जयसिंग राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पो. उपनिरीक्षक जयसिंग राठोड करत आहेत. परिसरात मोबाईल टॉवरवरील उपकरणे लांबवणाऱ्या टोळीचा शोध पोलीस घेत आहेत.









