
डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांची उल्लेखनीय कामगिरी
कल्पना (बदललेले नाव) या २४ वर्षीय महिलेवर यापूर्वी गंभीर हृदयविकारामुळे हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. अशा स्थितीत त्या गर्भवती राहिल्याने संपूर्ण गर्भधारणेचा कालावधी अत्यंत जोखमीचा मानला जात होता. दरम्यान, त्यांना हृदयाचा त्रास, पाठीचे दुखणे तसेच पोटात तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयात दाखल झाल्यानंतर स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. माया आर्विकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. वैभव पाटील यांनी महिलेची तपासणी केली. त्यानंतर मेडिसीन विभागातील तज्ज्ञ डॉक्टरां मत जाणून घेत हृदयाच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन केले. हृदयाची पूर्वीची शस्त्रक्रिया आणि सध्याची प्रकृती लक्षात घेता प्रसूतीदरम्यान आईच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे मेडिसीन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागातील तज्ज्ञ डॉ. वैभव पाटील, डॉ. प्राजक्ता पाटील, डॉ. साक्षी, भूलशास्त्र तज्ज्ञ डॉ. सतीश या टिमने प्रसूतीची सविस्तर योजना तयार केली.त्यानुसार आई व गर्भाच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात आले. आवश्यक त्या सर्व तपासण्या करून तज्ज्ञ डॉक्टर, भूलतज्ज्ञ, मेडिसीन विभाग आणि प्रशिक्षित परिचारिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून अत्यंत काळजीपूर्वक प्रसूती करण्यात आली. अखेर ही जोखमीची प्रसूती यशस्वी ठरली आणि आईसह बाळाची प्रकृती स्थिर राहीली. रुग्णाच्या नातेवाईकांनीही रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व वैद्यकीय कर्मचार्यांचे आभार मानले. अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टरांनी दाखविलेली तत्परता, अचूक निर्णयक्षमता आणि तज्ज्ञ उपचारांमुळे आई आणि बाळाला नवजीवन मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


हृदयाची शस्त्रक्रिया झालेल्या महिलांमध्ये गर्भधारणा आणि प्रसूती ही नेहमीच उच्च जोखमीची असते. अशा रुग्णांमध्ये प्रसूतीदरम्यान हृदयावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्यामुळे मेडिसीन तज्ज्ञ, भूलतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. योग्य नियोजन, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वेळेवर उपचार यामुळे ही प्रसूती यशस्वीरीत्या पार पडली. सध्या आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती चांगली असून आवश्यक वैद्यकीय देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.










